वाचा:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ जानेवारी रोजी होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. याच विषयावरून आमदार वैभव नाईक आणि नितेश राणे या जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये ट्वीटर वॉर सुरू झाले आहे. त्यातून या विषयाला राजकीय रंग आला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे. ‘नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा खासदार राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला “स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ” हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे!!’, असे ट्वीट नितेश यांनी केले होते. या ट्वीटनंतर वैभव नाईक यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनच नितेश यांच्यावर निशाणा साधला आहे. गद्दार राणेंना बाळासाहेब ठाकरे यांचे नावही घेण्याचा अधिकार नाही, असे सांगताना विमानतळाच्या नामकरणाची चिंता राणेंनी करू नये, त्यासाठी शिवसेना पक्ष सक्षम आहे, असेही वैभव नाईक यांनी ठणकावले. राणे यांची राजकीय अस्तित्वासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे म्हणून केवळ श्रेय घ्यायला राणे पुढे सरसावले आहेत. मात्र, सिंधुदुर्गवासीय राणेंना ओळखून आहेत. राणे शिवसेना संपवायला निघाले होते पण, शिवसैनिकांनी त्यांचे सर्व हल्ले परतून लावले आणि पुन्हा जिल्ह्यात शिवसेना फोफावली असेही आमदार वैभव नाईक म्हणाले. नाईक यांच्या या टीकेवर नितेश यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वाचा:
राऊत यांनी नितेश यांच्या भूमिकेचे केले स्वागत
एकीकडे वैभव नाईक यांनी नितेश यांचा समाचार घेतला असताना खासदार आणि शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी मात्र नितेश राणे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे व यापूर्वी अनेक शिवसैनिकांनी ही मागणी केली असल्याचे म्हटले आहे. या विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याची मागणीही झाली असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times