सिव्हिल लाइन्समधील सिंचन विभागाच्या विश्रामगृहात मंगळवारी सकाळी सुमारे तीन तास राज्यमंत्र्यांच्या ‘नजर कैद’चे नाट्य रंगले. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटनांच्या वतीने मुंबईतील रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक व राज्यमंत्री बच्चू कडू मुंबईला जाण्यासाठी सोमवारी रात्री नागपुरात आले. सिंचन विभागाच्या विश्रामगृहात विश्रांती घेतली. सकाळी ते मुंबईला जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना विश्रामगृहाच्या दारातच अडवले.
दोन पोलिस उपायुक्त, पोलिस निरीक्षकांसह प्रचंड ताफा तैनात करण्यात आला होता. त्यांच्या वाहनासमोरच पोलीस होते. विमानतळावर जाण्यापासून थांबवण्याचे आदेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे ३ तास नजरकैदेत असल्याप्रमाणे ठेवल्यावर बच्चू कडू यांना दुपारी साडेबाराच्या सुमारास विमानाने जाण्यासाठी सोडण्यात आले. महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यावर तोडगा काढण्यास तयार नाही. वाटाघाटीतून निर्णय होत नाही. २५-३० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अंबानी यांनी आता पंतप्रधानांना समजवावे, यासाठी मुंबईला जात असल्याचे बच्चू कडू यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
राज्यातील आघाडी सरकारचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असतानाही अडवण्यात आले. याकडे लक्ष वेधले असता, मला सरकारने थांबवले नाही तर, प्रशासन व पोलिसांचा काही गैरसमज झाला होता, असा दावाही कडू यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times