शहरात म्हैसपालन हा पारंपारिक व्यवसाय आहे. यामुळे आजही येथे दोनशेहून अधिक कुटुंबात आठ हजारावर म्हशींचे पालन केले जाते. धारोष्ण दूध पिण्याची सोय केवळ कोल्हापुरात असून त्यासाठी तीन चार ठिकाणी कट्टे बांधण्यात आले आहेत. या म्हशींना रोज धुण्यासाठी पंचगंगा, रंकाळा अथवा शहराच्या आसपास असणाऱ्या तलावात नेले जाते. यामुळे पाण्याचे प्रदुषण होत असल्याने या जलसाठ्यात त्यांना धुण्यास बंदी घालण्यात आली आहे. आत्तापर्यंत याबाबत आवाहन केले जात होते, यावेळी मात्र कडक निर्बंध घालण्यात आल्याने पशूपालक शेतकऱ्यांची अडचण झाली.
या पार्श्वभूमीवर शहरातील मंगेशकर नगर येथे माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या भागात एक जुनी खण आहे. त्या खणीतील पाण्याची वापर यासाठी करण्यात आला आहे. म्हैस धुण्यासाठी शॉबर बाथ सुरू करण्यात आला आहे. एकावेळी आठ ते दहा म्हशीना आंघोळ घालण्याची येथे सोय आहे. यामुळे रोज दुपारनंतर येथे शहरातील बहुसंख्य म्हैसी शॉवर बाथचा आनंद लुटतात. पाणी वाया जाऊ नये म्हणून वापरलेले पाणी बागेत सोडण्यात आले आहे. येथे त्यांच्यासाठी पार्लरही सुरू करण्यात आले आहे. त्यांचे केस कापल्यानंतर त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी केसकुंड बांधण्यात आला आहे. शेणकुंड बांधून त्यातून मिळणारे खत महापालिकेच्या उद्यानात वापरण्यात येणार आहे. सध्या या शॉवर बाथची आणि पार्लरची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
जुन्या खणीचा उपयोग करत येथे ऑक्सीजन पार्क, धोबीघाट, गणेशविसर्जन कुंड व अग्नीशमन दलासाठी पाण्याची उचलण्याची सोय करण्यात आली आहे. जनावरांना जलसाठ्यात सोडण्यास बंदी घातल्याने त्यांच्या सोयीसाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून सरकारने पंधरा लाखाचा निधी दिला आहे.
– विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक
जलसाठ्यात जनावरे धुण्यास बंदी घातल्याने आमची फार मोठी अडचण झाली होती. आता या शॉवरमुळे ही अडचण दूर झाली आहे. शहरात आठ हजारावर म्हशी असल्याने इतरत्रही असे शॉवर उभारणे आवश्यक आहे.
– मोहन माळी, पशूपालक
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times