म. टा. प्रतिनिधी, मुंबई: विमान, रेल्वे, एसटी, खासगी बस यांतून रात्री उशिरा तसेच पहाटे लवकर येणाऱ्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सीची सुविधा संचारबंदीच्या काळात उपलब्ध राहणार आहे. रात्रीच्या संचारबंदीत रिक्षा-टॅक्सी वाहतुकीवर निर्बंध नसून पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक प्रवासी वाहतूक करण्याची मुभा आहे, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष रेल्वेसह एसटी आणि खासगी बसमधून देखील प्रवाशांची वर्दळ सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संचारबंदीपूर्वी सुरू असलेली वाहतूक संचारबंदीच्या काळातही कायम राहणार आहे. यामुळे मुंबईत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत येणाऱ्या प्रवाशांना स्थानकातून घरी जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सींतून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. रेल्वे-बसमधून येणारा प्रवासी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्याबाबत अधिक स्पष्टता आणणे गरजेचे होते. सध्या लागू झालेल्या संचारबंदीत पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची वाहतूक करण्यास मुभा आहे, अशी सूचना प्रशासनाने केल्याचे टॅक्सी संघटनेचे ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.

तूर्त भाडेवाढ नाही

रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ तूर्त टळली असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत रिक्षा-टॅक्सींचा प्रस्ताव चर्चेसाठी येऊ शकला नाही. यामुळे आगामी बैठकीत यावर चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here