केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात विविध राज्यांतील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह विविध राज्यांतून पाठिंबा मिळत आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा ताफा अडवून घोषणाबाजी करत काळे झेंडे शेतकऱ्यांनी दाखवले होते. त्यानंतर १३ शेतकऱ्यांवर राज्यातील भाजप सरकारने गुन्हे दाखल केले. यावरून शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून आणि हरयाणाच्या भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. खट्टर सरकारने सूडाने जी कारवाई केली आहे, ती संतापजनक आहे. शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे? लोकप्रियता घटल्यानंतर उतरती कळा लागून ऱ्हासाच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास आहे, असे म्हणावे लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
ठळक मुद्दे:
>> कृषिप्रधान देश असे बिरूद मिरवणाऱ्या देशातील शेतकरी कुणी खुनी, मारेकरी, नक्षलवादी, अतिरेकी वगैरे आहेत काय?
>> केंद्र सरकारने आणलेले तीन जाचक रद्द करण्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे काय?
>> केंद्रातील सरकार आणि राज्यकर्त्या पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाचा धसका घेतला आहे. ते आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार ठरवू लागले आहेत.
>> दिल्लीवर धडका देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याची सर्व सरकारी कारस्थाने शेतकऱ्यांच्या भक्कम एकजुटीमुळे धुळीस मिळाली.
>> पायाखालची वाळू सरकलेल्या राज्यकर्त्यांनी आता शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवून दडपशाही सुरू केली आहे.
>> देशातील शेतकरी मारेकरी आणि दंगलखोर असूच शकत नाही. तो अन्नदाता आणि सोशिक आहे. लाखो शेतकरी बांधवांनी आत्महत्या करूनही कधी हातात शस्त्र घेण्याचा विचार केला नाही.
>> शेतकऱ्यांनी ठरवले असतेच, तर राज्यकर्त्यांना पळता भुई थोडी झाली असती. पण शेतकरी अजूनही संयमाने घेत आहेत.
>> शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे हरेक प्रयत्न सरकारने केले. पण नेटाने सुरू आहे.
>> आंदोलक शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसते?
>> खुनाच्या प्रयत्नाचे आणि दंगलीचे खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा संघर्ष मिटवता येणार नाही, हे हरयाणा आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times