भारत भालके यांच्या निधनानंतर मंगळवेढ्यात विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यात पार्थ पवारांचे नावही चर्चेत आले आहे. तर पार्थ यांनी ही निवडणूक लढवावी, अशी मागणी समर्थकांकडून होत आहे. पार्थ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना यासंबंधी प्रश्नावर उत्तर दिलं आहे. ‘मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत पक्षाच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. मात्र, अद्याप पार्थ यांना उमेदवारी देण्याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले.
‘भाजपच्या विरोधात जाणाऱ्या नेत्यामागे ईडी’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यावरून राष्ट्रवादीचे जळगावातील पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि केंद्र सरकारविरोधात आज घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या विरोधात जाणाऱ्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो. खडसेंबाबत घाबरायचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. देशहिताच्या निर्णयापेक्षा खुनशी प्रवृत्तीने राजकीय नेत्यांच्या मागे ईडी लावली जाते, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी मत नोंदवले. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निधी वाटपामध्ये सरकार दुजाभाव करत असल्याचा गैरसमज विरोधकांमध्ये निर्माण झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. फडणवीस हे इस्लामपूरमध्ये येत आहेत. मात्र, ते स्वतःला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि पक्षाला स्थिरस्थावर करण्यासाठी येत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times