केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ भाजप व रयत क्रांती संघटनेने चार दिवसांची किसान आत्मनिर्भर यात्रा काढली. या यात्रेद्वारे त्यांनी कृषी विधेयकांबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. यात्रेचा समारोप रविवारी इस्लामपूरमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘कृषी विधेयकांबाबत राज्य सरकारची दुटप्पी भूमिका आहे. विधेयकांच्या अंमलबजावणीसाठी ठाकरे सरकारने अध्यादेश काढला. काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात बाजार समित्या मोडीत काढण्याचे सांगितले होते. मात्र, राजकीय दुकानदारी बंद होण्याच्या भीतीने त्यांनी कृषी विधेयकांना विरोध सुरू केला आहे. हमीभाव न देणाऱ्यांना एक वर्षाचा कारावास व्हावा, असा कायदा आम्ही केला होता. पण विधान परिषदेत त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला. अडते आणि दलालांसाठीच आता पुन्हा कृषी कायद्यांना विरोध सुरू आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले चांगले निर्णय रद्द करण्याचा सपाटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावला आहे. ठाकरे यांनी अजूनही हेक्टर आणि एकरमधील फरक सांगावा. एका एकरात किती गुंठे असतात ते सांगावे. वादळ आणि अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाईचे काय झाले? अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. राज्यात कृषी विधेयकांवरून शेतकऱ्यांना उसकावण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, माजी खासदार धनंजय महाडिक, आदी उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times