नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात करोनाचा ग्राफ उतरताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वाढत असताना आजची आकडेवारी थोडी दिलासा देणारी ठरली आहे. आज दिवसभरात २ हजार ४९८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ४ हजार ५०१ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण १८ लाख १४ हजार ४४९ करोना बाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४. ४ टक्के इतके झाले आहे.
राज्यात आणखी ५० जणांचा करोनानं मृत्यू झाला असून आतापर्यंत करोना संसर्गानं ४९ हजार ३०५ रुग्ण दगावले आहेत. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २. ५७ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,४३,७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२२,०४८ (१५.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५२,५३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या ५७ हजार १५९ अॅक्टिव्ह रुग्ण असून पुणे जिल्ह्यात १४ हजार २३१ सर्वाधिक रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यात १० हजार ९७९ व मुंबईत ८ हजार ८६२ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times