रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी ग्रामपंचायतींसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. कन्नड तालुक्यातील अनेक गावांत संजना जाधव यांनी पॅनल उतरवण्याची तयारी सुरु केली असतानाच आदित्य जाधव यानं आईविरोधात हर्षवर्धन जाधव यांचे पॅनल उभे केलं आहे. त्यामुळं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव पुन्हा सक्रिय होत असल्याची चिन्ह आहेत. त्याचबरोबर रायभान जाधव यांच्या तिसऱ्या पिढीनं राजकारणात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
हर्षवर्धन जाधव यांच्यावर ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याच्या आरोप असून त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या गैरहजेरीत आदित्यनं सर्व सूत्र आपल्या हातात घेतली असून या निमित्तानं राजकारणात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे आदित्य आता इयत्ता अकरावीत शिकत असतानाच त्यांनं घेतलेला या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कोतुक होत आहे.
पहिल्याच पत्रकार परिषदेत आदित्य यानं पत्रकारांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली असून हर्षवर्धन जाधव हे शेतकऱ्यांसाठी राजकारणात सक्रिय होत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका लढवणार असल्याची घोषणाही त्यानं पत्रकार परिषदेत केली.
कोण आहेत हर्षवर्धन जाधव?
हर्षवर्धन हे मनसेचे माजी आमदार आहेत. मनसे ऐन भरात असताना विधानसभेवर निवडून गेलेल्या १३ आमदारांमध्ये जाधव यांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळं मनसेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूकही जिंकली होती. मात्र, तिथंही त्यांचं जमलं नाही. त्यांनी शिवसेनेलाही रामराम ठोकला. शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढला. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times