भाजप मेहबूबा मुफ्तींना आयोध्या दौऱ्यात सोबत नेणार का?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रामलल्लाचे दर्शनासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही सोबत घेऊन जाणार का, असा प्रश्न राऊत यांना पत्रकारांनी विचारला. यावर खासदार राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला हाणला. ते म्हणाले की अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र हे भारतीय जनता पक्षाला दिसत नाही. त्यांना हवे तेच ते पाहतात, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर शरसंधान केले. भारतीय जनता पक्षाने ज्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते, त्या मेहबूबा मुफ्तींना आयोध्या दौऱ्याच्या वेळी सोबत नेणार का, असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.
हजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार
आता राम मंदिराचे काम सुरू होण्यात कोणतीही अडचण नसल्याचेही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार असल्याचेही राऊत म्हणाले.
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच, आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ते कधी अयोध्येला जातील याबाबचत अनिश्चितता होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळाचे काम मार्गी लागल्यानंतर मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्याला निघतील अशी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र ते नेमके केव्हा अयोध्या दौऱ्यावर जातील हे गुलदस्त्यातच होते. संजय राऊत यांच्या ट्विटमुळे दौऱ्याची नेमकी तारीख स्पष्ट झाली नसली, तरी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर ठाकरे केव्हाही दौरा आयोजित करू शकतात असे म्हटले होते. त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करत याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times