अहमदनगर: मधल्या काळात अडचणीत सापडलेल्या अर्थात ‘महानंद’ची आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहेत. ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आलेले विविध निर्णय यासाठी उपयुक्त ठरले आहेत. ‘आरे ब्रॅंड’ची काही उत्पादने ‘महानंद’मध्ये तयार करण्याचे काम मिळाले असून संरक्षण मंत्रालयासोबत दूध खरेची करारही झाला असून त्यानुसार सैन्य दलांना महानंदमधून दूध पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती ‘महानंद’चे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

देशमुख यांनी सांगितले की, ‘सहकारी दूध संघांच्या संकटाच्या काळात मदतीला धावलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला चांगले दिवस यायला सुरुवात झाली आहे. सरकार सत्तेत आल्यापासून संघाने भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. सरकारने आरे ब्रँडची उत्पादने बनवण्याचे काम महानंदला दिले आहे. लवकरच आरेची उत्पादने बनवण्यास महानंद सुरुवात करणार आहे. आरेचे मुंबईमधील स्टॉल महानंदला मिळाल्यापासून महानंद’ची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. महानंदच्या दुग्धजन्य उत्पादनांची विक्री संपूर्ण राज्यभर करण्यासाठी दूध विक्री स्टॉलची लवकरच निर्मिती केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दुग्धविकास मंत्री सुनील केदार व महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महानंद व राज्यातील सहकारी दूध संघांना मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.

करोना काळात देशाला लॉकडाउनचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी व्यवस्था ठप्प झाली होती. त्या काळात दूध संघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु अशा परिस्थिती महाविकास आघाडी सरकार शेतकरी व दूध संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे सहकार क्षेत्राला उभारी मिळाली. महानंदची अतिरिक्त दुधाची बनलेली दूध भुकटी राज्य सरकारच्या अटल अमृत आहार योजनेअंतर्गत व बालकल्याण आदिवासी विभागामार्फत योजनेत समाविष्ट सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. महानंद व संरक्षण मंत्रालय यांच्यात करार झाला असून भारतीय सैन्याला दूध पुरवठा महानंदने सुरू केला आहे. महानंदची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यामुळे आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे,’ असेही देशमुख यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here