ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हा दावा केला. पत्रकार राजू परुळेकर यांनी राऊत यांची मुलाखत घेतली, यावेळी राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या देशाला विरोधी पक्षाची मोठी परंपरा आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षाला जेरीस आणणं ही आपल्या देशाची परंपरा नाही, असं सांगतानाच नेते देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होणे हा काळाने उगवलेला सूड आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. मागच्या सरकारने ज्यांना ज्यांना आत टाकले ते बाहेर आले. मंत्रालय हे लोकांसाठी असतं. मंत्रालय म्हणजे कारस्थान करण्याचा अड्डा नाही, असंही ते म्हणाले.
मागच्या टर्ममधील देवेंद्र फडणवीस सरकारचे कार्यकर्ते, अधिकारी आज आमच्यासोबत आहेत. हे अधिकारी आमदारांना फोन करून फडणवीस सरकारला पाठिंबा द्यायला सांगत होते, असा गौप्यस्फोट करतानाच राज्यातील सरकार स्थिर आहे. हे सरकार पाच वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करेल. कुणालाही त्याची चिंता करायची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी आपण मनाने कधीच भाजपच्या जवळ गेलो नसल्याचं स्पष्ट केलं. माझ्या पक्षाची आणि पक्ष प्रमुखांची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे हीच भूमिका मी सातत्याने घेतल्याचं ते म्हणाले.
पवारांनी देशाचं नेतृत्व करावं
महाराष्ट्र हा देशातील परिवर्तनाचा केंद्र बिंदू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. संकटकाळी अनेक नेते त्यांच्याकडे सल्ला घ्यायला जातात. शरद पवार हे शेवटचा मालुसरा आहेत. त्यांच्यासारखे नेते आता नाहीत. त्यांनी देशाचं नेतृत्व करावं. शिवसेना त्याांना मदत करेल. पंतप्रधान म्हणून मराठी माणूस बसावा ही आमची इच्छा आहे, असं राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आधी मुख्यमंत्री होते. आता पंतप्रधान आहेत. हा बदल लक्षात घ्या, असं सांगतानाच महाराष्ट्र हातातून जाणं हा भाजपला मोठा धक्का आहे. महाराष्ट्र हातात नसणं म्हणजे देश हातात नसणं हे २०२२ साली भाजपला दिसून येईल. भाजपला २०२२ साली परिणाम दिसतील, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकणं
राज्यात पुन्हा सत्तेत येऊ असं काँग्रेसला स्वप्नातही वाटलं नसेल, असं सांगतानाच देशात गांधी घराण्याच्या त्यागाच्या आसपास एकही कुटुंब जाऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष म्हणजेच स्वातंत्र्याची चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टोलेजंग नेते आहेत. त्यांना गांधी कुटुंबावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करणं शोभत नाही. काँग्रेसवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
केंद्राला काही लपवायचं असेल
राऊत यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारशी चर्चा न करता कोरेगाव-भीमाचा तपास केंद्रानं एनआयएकडे सोपवण्यात आला. हा दबाव तंत्राचा भाग असेल किंवा सरकारला काही लपवायचं असेल, असा आरोप राऊत यांनी केला. महाराष्ट्र सरकार दिल्लीपुढे कोणत्याही परिस्थितीत झुकणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
अजितदादांच्या बंडात पवारांचा हात नव्हता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडावरही राऊत यांनी भाष्य केलं. त्या रात्री राज्यपाल झोपलेच नव्हते. राजभवन उघडच होतं. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचा मला धक्का बसला नाही. पवार परत येतील ही माझी प्रतिक्रिया होती. या प्रकरणात शरद पवारांचा हात नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पत्रकार म्हणून दाऊदला भेटलो
यावेळी राऊत यांनी पत्रकार म्हणून अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भेटल्याचं स्पष्ट केलं. पत्रकार म्हणून माझ्या कामाचा भाग होता. त्यामुळे मी दाऊदला भेटलो होतो. अंडरवर्ल्ड हा शब्द मुंबईत जन्माला आला. जगात शिकागो आणि मंबईत माफियांचं समांतर सरकार होतं. माफिया नितिमत्ता पाळायचे. दादागिरी म्हणजे गुंडगिरी नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी अंडरवर्ल्डचा एक किस्साही सांगितला. अभिनेत्री हेलनला तिचा पहिला नवरा त्रास द्यायचा. त्यामुळे हेलनने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. दिलीप कुमार यांनी त्यांना करीम लालांकडे पाठवलं. करीम लालांनी तिच्या नवऱ्याला धडा शिकविला. त्यावेळचे माफिया असे होते, असं त्यांनी सांगितलं.
>> आमचा फोन टॅप करून काँग्रेसचा आत्मविश्वास गेला
>> मी चांगल्या शिव्या देतो हे त्यांना फोन टॅपिंगमधून दिसलं असेल
>> देशाच्या नसानसात विष पेरलं जातंय. धार्मिक द्वेष पसरविला जातोय. देशाचं विभाजन होण्याची भीती वाटतेय.
>> राज्यातील अनेक शहरात गुजराती समाजाबरोबर शिवसेना संवाद साधणार
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times