म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: ९४ वे अखिल भारतीय नाशिक शहरात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीच्या दौऱ्याची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर येत्या आठ जानेवारीला संमेलनाच्या स्थळाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं राजकीय आणि सामाजिक पाठबळ असलेल्या नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळणार का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची रविवारी बैठक पार पडली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. साहित्य संमेलनासाठी पुणे, अंमळनेर, नाशिक, सेलू येथील संस्थेची निमंत्रणे आली होती. येथील दोन संस्थांनी निमंत्रणाचे प्रस्ताव पाठवले होते. त्यात सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि लोकहितवादी मंडळ यांचे प्रस्ताव होते. या प्रस्तावांवर बैठकीत चर्चा होऊन साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची निवड करण्यात आली. या समितीत अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते आणि प्रकाश पायगुडे यांचा समावेश आहे. ही समिती नाशिक येथे सात जानेवारीला स्थळ निवडीसाठी भेट देणार आहे. तर आठ जानेवारीला स्थळ निवड समितीची औरंगाबादेत बैठक होणार आहे. या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संमेलनाच्या स्थळाची शिफारस महामंडळ करणार आहे.

नाशिक येथील लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले असून ही संस्था मागील ५० वर्षांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. अंमळनेर येथील संस्थेने आर्थिक कारणामुळे संमेलन घेण्यास नकार दिला होता. सार्वजनिक वाचनालयाचा एक खटला न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना संमेलन देण्यास महामंडळाने असहमती दाखवली होती. दरम्यान, रविवारच्या बैठकीत महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी २०१९-२० चा अंकेक्षित अहवाल सादर केला. तसेच २०२०-२१ च्या आर्थिक नियोजनाला आणि ‘अक्षरयात्रा’ संपादक मंडळाला मान्यता देण्यात आली. महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कपूर वासनिक यांना कार्योत्तर मान्यता देण्यात आली. डॉ. दादा गोरे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. उषा तांबे, प्रा. प्रतिभा सराफ, उज्ज्वला मेहेंदळे (मुंबई), प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार (पुणे), गजानन नारे, विलास मानेकर (नागपूर), प्रदीप दाते (वर्धा) आणि कपूर वासनिक (छत्तीसगड) हे महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.

दिल्लीकरांची टीका
सहा वर्षांपूर्वी घुमान येथे संमेलन घेतलेल्या ‘सरहद’संस्थेने (पुणे) यंदा दिल्लीत संमेलन घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. एकाच संस्थेला लागोपाठ संमेलन देणे योग्य नसल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. दिल्ली येथे संमेलन भरवण्यासाठी महामंडळाकडे सतत पाठपुरावा करण्यात आला होता. दिल्ली विद्यापीठातील मराठी भाषेचे शिक्षण दिल्लीतील मराठी समूहाने का बंद होऊ दिले, दिल्ली आकाशवाणीवरुन प्रसारीत होणाऱ्या बातम्या सुरू ठेवण्यासाठी तिथल्या मराठी भाषिकांनी कोणते प्रयत्न केले, साहित्य अकादमी पुरस्कार सोहळ्याला तिथली मराठी माणसं आपल्या भाषेतील लेखकासाठी कधी येतात का असे प्रश्न महामंडळाचे अध्यक्ष ठाले यांनी सोशल मीडियाच्या एका ग्रुपमध्ये उपस्थित केले होते. त्यावर दिल्लीच्या काही मराठी भाषिकांनी टीका केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here