२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुलाबा येथील ताज आणि नरीमन पॉइंट परिसरातील ट्रायडंट हॉटेलच्या बाहेरील रस्ते आणि पदपथ सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी बंद केले होते. गेल्या काही वर्षांत ताज हॉटेलनं बंद केलेल्या पदपथांवर झाडाच्या कुंड्या, तसंच अन्य साहित्य ठेवून अतिक्रमण केलं. त्यामुळं महापालिकेनं हॉटेलला ८ कोटी ८५ लाख रुपये दंड ठोठावला होता. यापैकी ‘ताज’नं ६६ लाख रुपये भरले आहेत. मात्र, आता महापालिकेनं दंडमाफी करत या वादावर पडदा टाकला आहे.
वाचा:
‘ताज’प्रमाणेच ट्रायडंट हॉटेल व मुंबई स्टॉक एक्स्चेंजलाही दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बीएसईला दरमहा भाड्यापोटी दोन लाख १२ हजार याप्रमाणे चार कोटी रुपये दंड, तसेच १५ टक्के व्याजापोटी ६० लाखांहून अधिक रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती. नंतर हिशेबात गोंधळ झाल्याचे स्पष्ट करून, दोन कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला. ‘ताज’ला दंडमाफी देताना ट्रायडंट व बीएसईला सूट देण्यात आली नाही. या प्रकरणी महापालिका सभागृहात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षानं प्रशासनाला धारेवर धरलं होतं. हा दुजाभाव का, असा सवाल करण्यात आला होता. तोच धागा पकडून आशिष शेलार यांनी शिवसेनेवर कडवट शब्दांत टीका केली आहे.
वाचा:
‘टाटांच्या हॉटेल ताजला ९ कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेनं बीएसईवर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला देता आणि टाटा, बिर्लांना करात सवलती देता. वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!,’ अशी टीका शेलार यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times