‘शहरांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. हा प्रस्ताव २० वर्षांपूर्वीच आम्ही अमान्य केला होता. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.
नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु असल्याच्या वृत्ताचंही नवाब मलिक यांनी खंडन केलं आहे. ”अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीतील अजेंडावरील नाहीये. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरीही सरकारला कोणताही धोका नाही,’ असंही ते म्हणाले आहेत. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या मुद्द्यांवर एकत्रित बसून तोडगा काढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच, सरकारमध्ये फूट पाडण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यांच्या नामांतराचा मुद्दा काही घटकांकडून पुढे केला जातो आहे, अशी टीकाही केली आहे.
औरंगाबादच्या नामांतराच्या या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये दोन गट पडले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षानं नामांतराला स्पष्ट विरोध केला आहे. तर, एनडीएतील रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानंही तीच भूमिका घेतली आहे. आता महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही नामांतर योग्य नसल्याचं म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times