मुंबईः राज्यात सोमवारी विक्रमी संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. आज मात्र, करोनाचे आकडे पुन्हा उलटे फिरले आहेत. आज राज्यात तब्बल ३ हजार १६० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, ६४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ()

सोमवारी मोठ्या संख्येने रुग्णांनी करोनावर मात केली होती. करोनामुक्त रुग्णांची ही आकडेवारी पाहता हे चांगलं लक्षण असल्याचे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा करोनाच्या आकड्यात मोठी तफावत दिसून येत आहे. आज करोनामुक्त रुग्णांपेक्षा करोनबाधित रुग्ण अधिक आढळले आहेत. आज ३ हजार १६० नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळं राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ५० हजार १७१ इतकी झाली आहे.

आज २ हजार ८२८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मुक्त रुग्णांची संख्या १८ लाख ५० हजार १८९ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.८७ % एवढे झाले आहे. तर राज्यात सध्या ६४ करोनाबळींची नोंद झाली आहे. करोनामुळं दगावलेल्या रुग्णांची एकूण मृत्यूसंख्या ४९ हजार ७५९ इतकी झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्यादेखील घटताना दिसत आहे. सध्या राज्यात ४९ हजार ०६७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३०,६१,९७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५०,१७१ (१४.९३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,५५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here