गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं नामांतरास ठाम विरोध केल्यानंतर नामांतराचा मुद्दा अधिकच पेटला होता. मात्र, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाल्याअसून त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना एक पत्र लिहलं आहे.
औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही संभागृहात मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरुन केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.
औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज असे नामांतर करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने अधिसूचना काढावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांना पाठवले आहे.
संभाजीनगर उल्लेख
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवर आज औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. त्यामुळं ठाकरे सरकारकडून औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times