वाचा:
औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे रेटण्यात आला आहे. शिवसेना या नामांतरासाठी आग्रही असून त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र यातून मध्यम मार्ग काढला जाईल असे म्हणत सावध भूमिका घेतली आहे. या सगळ्या वादात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख वारंवार केला जात असल्याने आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे.
वाचा:
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवर बुधवारी सर्वप्रथम औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाच्या इमेजवर हा उल्लेख होता. ‘संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस मान्यता’ असे या इमेजवर नमूद करण्यात आले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनच आक्षेप नोंदवला होता. ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया’, असे थोरात यांनी नमूद केले होते. असे असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवर आज पुन्हा एकदा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे.
वाचा:
‘राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे. त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’, असे ट्वीट आज CMOMaharashtra या ट्वीटर हँडलवर करण्यात आले आहे. या ट्वीटने काँग्रेस व शिवसेनेतील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
वाचा:
काय म्हणाले…
राष्ट्रवादीने मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे तीन पक्षांचे सरकार आहे. किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे. त्यामुळे तिघांचे सरकार चालवत असताना काही विषय कधीही निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करून योग्यपद्धतीने मार्ग काढू. यात नक्की काय झालं आहे. कुणी जाणीवपूर्वक गडबड केली आहे का? हे तपासू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times