उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एका महिलेवर बलात्काराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय चंद्रमुखी देवी यांनी बदायूंमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीयांची भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रमुखी यांनी पीडितेलाच चुकीचं ठरवलं. महिलांनी वेळीअवेळी घराबाहेर पडू नये. पीडित संध्याकाळच्या वेळी एकटी बाहेर गेली नसती तर ही घटना घडली नसती, असं त्या म्हणाल्या.
घटना पूर्णपणे सुनियोजित
महिलेला फोन करून बोलावण्यात आलं होतं. यामुळे हे प्रकरण सुनियोजित होतं. फोन आल्यावर पीडित महिला तिथे गेली आणि अशी परिस्थिती उद्भवली, असं चंद्रमुखी देवी म्हणाल्या. मात्र, वादग्रस्त वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर चंद्रमुखी देवी यांनी व्हिडिओ जारी करत माफी मागितली. प्रकरणी विविध वृत्तवाहिन्यांमधून आपलं वक्तव्य दाखवण्यात येत आहे. महिलांनी संध्याकाळी घराबाहेर पडू नये, असं दाखवलं जात आहे. पण आपण या संदर्भात काहीही बोललो नाही, असं त्या म्हणाल्या.
व्हिडिओ जारी करून दिलगिरी व्यक्त
आपल्या वक्तव्याचा कुठूनही असा अर्थ निघत असेल तर ते मी मागे घेईन आणि पीडित कुटुंब आणि महिलांची माफी मागते, असं चंद्रमुखी म्हणाल्या. महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर माध्यमांमधून टीका झाली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्याने असं वक्तव्य करु नये. त्यांनी महिलांच्या हिताबद्दल बोललं पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. त्यांनी वादग्रस्त विधान करून महिलांचा अपमान केला आहे, असं टीका केली गेली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times