अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांना आता खुर्ची सोडावी लागणार आहे. सत्ता हस्तांतरणाची वेळ जवळ येताच ट्रम्प यांचे समर्थक अस्वस्थ झाले आणि त्यांनी थेट संसदेवरच हल्ला चढवला. या घटनेमुळं जगभरातून ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. पंतप्रधान मोदींनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘लोकशाही प्रक्रियेला विकृत करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदींच्या या प्रतिक्रियेवर तिरकस भाष्य केलं आहे. शिवसेनेनं ट्रम्प यांच्यावर टीका करतानाच मोदींनाही चिमटे काढले आहेत.
‘ट्रम्पसारखे लोक राज्यकर्ते म्हणून निवडून दिले जातात ही मोठी शोकांतिका आहे. खोटी आश्वासने, फसव्या घोषणा, भरपूर थापा व माकडचेष्टांना लोक भुलतात व चूक करून बसतात. त्याचीच किंमत आज अमेरिका चुकवत आहे. याच ट्रम्प यांच्या उपस्थितीत ‘हाऊ डू मोदी’सारखे सोहळे अमेरिकेत पार पडले. अहमदाबादेत ५० लाख लोकांना जमवून ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाची सलामी देण्यात आली. ट्रम्प यांच्यासाठी मोदी सरकारने अहमदाबादेत लाल गालिचे अंथरले. हा समस्त गुजराती बांधवांचा, गांधी, सरदार पटेलांचाच अपमान आहे. या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा:
‘चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांनी गुजरातेत नेऊन मिरवले. त्या चिनी राष्ट्राध्यक्षाने आता लडाखमध्ये त्यांचे सैन्य घुसवले. ट्रम्प यांना अहमदाबादेत नेले, त्यांनी येताना कोरोना आणला व आता लोकशाहीची सरळ हत्याच केली. आमचे परराष्ट्र धोरण हे प्रवाहपतित होत आहे. भुलभुलैयाच्या मोहात पडून नुकसान करून घेत आहे. त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे,’ असंही अग्रलेखात नमूद करण्यात आला आहे.
अमेरिका व भारताच्या लोकशाहीत विसंगती जास्त आहे. आमच्याकडे निवडणुकांत पराभव होऊ नये यासाठीच हिंसाचार, धर्मद्वेषाचे राजकारण पेटवले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना हतबल केले की त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची वेळच येत नाही. ट्रम्प हे आमच्या देशात येऊन काय शिकले?,’ असा टोला शिवसेनेनं केंद्रातील सत्ताधाऱ्यांना हाणला आहे.
‘भारतीय लोकशाहीकडून अमेरिका, ब्रिटनने धडे घ्यायला हवेत. निवडणुकीत पराभव होताच इंदिराजी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा प्रत्येक नेत्याने शांतपणे सत्तेचे हस्तांतरण केले आहे. उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर तेसुद्धा त्याच परंपरेचे पालन करतील,’ असा विश्वासही शेवटी शिवसेनेनं व्यक्त केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times