या संस्थेचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू असल्याने कामगार संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून त्याचे पडसाद उमटत आहेत. या संस्थेचे स्थलांतर करू नये, अशी मागणी कामगार संघटना आणि नागरिकांनी केली असून लोकप्रतिनिधींनी आंदोलनांचे इशारेही दिले. या पार्श्वभूमिवर खासदार डॉ. विखे पाटील यांनी दिल्लीत व्हीआरडीईच्या चेअरमनचे तांत्रिक सल्लागार संजिव कुमार यांच्यासह संरक्षण विभागाच्या वरिष्ठ आधिका-यांची भेट घेतली. यासंबंधी माहिती देताना विखे पाटील म्हणाले, ‘नगरची व्हीआरडीई संस्था स्थलांतरित करण्याचा कोणताही प्रस्ताव संरक्षण विभागाचा नाही. याबाबत सुरु झालेल्या चर्चा निरर्थक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संस्था नगरलाच राहणार आहे. भविष्यात आत्मनिर्भर भारत योजनेतून संरक्षण विभागाच्या या संस्थेचे अधिक बळकटीकरण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या संस्थेसोबत अन्य प्रकल्पही देण्याचा विचार व्हीआरडीईच्या आधिका-यांनी बोलून दाखविला. नगर येथील व्हीआरडीईमधील आधिकारी आणि कर्मचा-यांशी आपण स्वत:भेट घेवून त्यांना ही माहिती देणार आहोत.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times