मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व नवाब मलिक यांच्या जावयाच्या अटकेवर पत्रकारांनी जयंत पाटलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पाटील यांनी सर्व प्रश्नांना स्पष्ट उत्तरं दिली. ‘नवाब मलिक यांच्या जावयानं काही गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना कशाच्या आधारे अटक केली आहे हे मला माहीत नाही. चौकशीतून सर्वकाही स्पष्ट होईल व पुढील कारवाई होईल. त्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप करणार नाही आणि तसाही प्रश्नच येत नाही,’ असं पाटील म्हणाले. मात्र, ‘जावयाचं कुटुंब स्वतंत्र असतं. जावयानं काही गुन्हा असेल तर सासऱ्याच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम होण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दलही जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. ‘भाजप हा विरोधी पक्ष आहे. राजीनामा मागणं हे त्यांचं काम आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांच्या संदर्भात पक्षपातळीवर चर्चा केली जाईल. गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, केवळ कोणी आरोप केले म्हणून राजीनामा घेतला जाईल असं होणार नाही. त्याबाबत सर्व बाजू पुढं आल्यानंतरच निर्णय होईल,’ असं पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर होत असलेले आरोप व चौकशांमागे राजकारण आहे का याबाबत विचारलं असता, ‘त्यावर मला काहीही बोलायचं नाही. कारण आम्हाला पोलिसांवर दबाव आणायचा नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी अशीच आमची भूमिका आहे,’ असं पाटील यांनी सांगितलं. ‘केंद्रातील मोदी सरकार विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स व अन्य यंत्रणांचा वापर करतंय हे जगजाहीर आहे. लोकांनाही ते कळून चुकलं आहे. त्यामुळं त्यावर लोकही आता विश्वास ठेवत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times