भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना उद्या (१५ जानेवारी)पासून ब्रिस्बेने येथे होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघातील ११ खेळाडूंची यादी आज जाहीर होणे अपेक्षित होते. पण बीसीसीआयने चौथी कसोटी खेळणाऱ्या अंतिम खेळाडूंची यादी जाहीर केली नाही. ही यादी जाहीर न करण्यामागे जसप्रीत बुमराहची दुखापत हे कारण असल्याचे समोर आले होते.
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी यावेळी बुमराबद्दल सांगितले की, ” भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराबरोबर आमची वैद्यकीय टीम काम करत आहे. पण सध्याच्या घडीला त्याच्या संघ समावेशाबाबत सांगणे उचित ठरणार नाही. सामना सुर होण्यापूर्वी बुमरा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. जर बुमरा फिट असेल तर त्याला नक्कीच खेळवण्यात येईल, पण जर तो फिट नसेल तर त्याला या सामन्यात संधी मिळू शकणार नाही.”
भारतीय संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे की जसप्रीत बुमराहने चौथी कसोटी खेळावी. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्याचे महत्त्व वाढले आहे. उद्या सकाळी जेव्हा अजिंक्य रहाणे नाणेफेकीसाठी मैदानात येईल तेव्हाच भारतीय संघात कोणाला घेतले आहे हे समजेल. संघ व्यवस्थापनाच्या मते जर बुमराह ५० टक्के फिट असेल तरच तो सामना खेळेल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. बुमराहच्या आधी इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल हे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. त्या शिवाय ऋषभ पंत, हनुमा विहारी, आर अश्विन यांना देखील दुखापत झाली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times