नवीन कृषी कायद्यांविरूद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या ८ फेऱ्या झाल्या आहेत. पण यातून कुठलाही तोडगा निघालेला नाही. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये शुक्रवारी चर्चेची नववी फेरी होणार आहे. ‘आम्ही शुक्रवारी सरकारबरोबर होणाऱ्या बैठकीत भाग घेऊ. आमचा पुढील निर्णय सरकार कसे वागतं यावर अवलंबून असेल. समितीतील एका सदस्याने आधीच राजीनामा दिला आहे, ही चांगली गोष्ट आहे, असं क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे प्रमुख दर्शन सिंह यांनी गुरुवारी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांसंबंधी स्थापन केलेल्या ४ सदस्यांच्या समितीतून भूपिंदर सिंग मान हे बाहेर पडलेत.
शेतकरी संघटना शुक्रवारी सरकारसोबत होणाऱ्या चर्चेत सहभागी होतील. उद्या काय होते ते पाहूया. पण आमची कामगिरी संपेपर्यंत सरकारबरोबरच्या बैठका सुरूच राहतील. आम्ही सरकारबरोबरच्या बैठकीला विरोध करणार नाही’, असं भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितलं.
प्रजासत्ताक दिनी शेतकरी दिल्लीतल्या लाल किल्ल्यापासून इंडिया गेटपर्यंत मोर्चा काढतील अशी घोषणा राकेश टिकैट यांनी केली आहे. ‘राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंतचा परेड होईल. आम्ही लाल किल्ल्यापासून इंडिया गेटपर्यंत चालत जाऊ. दोघांचा मेल एकच असेल. जगातील सर्वात ऐतिहासिक परेड होईल जिथे शेतकरी एका बाजूने चालेल आणि सैनिक एका बाजूने. शहीदांची अमर जवान ज्योती इंडिया गेटवर या दोघांमध्ये समेट होईल’, असं राकेश टिकैत म्हणाले.
सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील नियोजित बैठक १५ जानेवारी दुपारी १२ वाजता सुरू होईल, असं राकेश टिकैट म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times