वाचा:
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात पार्थो दासगुप्ता यांच्यासह रोमिल रामगढिया व रिपब्लिक टीव्हीचे विकास खानचंदानी यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील संभाषणाचा तपशील जोडण्यात आला असून त्यातील काही भाग सोशल मीडियात लीक झाला आहे. त्यावर गेले दोन दिवस मोठं वादळ उठलं आहे. या संभाषणात अनेक धक्कादायक तपशील आहेत. पार्थो यांनी एका ठिकाणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांचा निष्क्रिय असा उल्लेख केला आहे तर सर्व मंत्री आपल्यासोबत असल्याचा उल्लेख अर्णब यांच्याकडून झाला आहे. पंतप्रधान कार्यालय तसेच अन्य राजकीय नेत्यांच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासनही गोस्वामी देत आहेत. काही ठिकाणी ‘AS’ असा सांकेतिक उल्लेखही आढळतो. या चॅटिंगमध्ये एका ठिकाणी माजी मंत्री राज्यवर्धन राठोड यांचाही उल्लेख आहे. २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबतही अत्यंत संवेदनशील असे संभाषण यात झाले आहे.
वाचा:
या सर्वावर बोट ठेवत आमदार रोहित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाजपला लक्ष्य केले आहे. कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरून दिसतंय, असं नमूद करतानाच भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का?, असा गंभीर सवाल रोहित यांनी केला आहे. एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लीक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे, अशी भीती रोहित यांनी या ट्वीटमध्ये व्यक्त केली आहे.
वाचा:
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनीही यावरून भाजपला लक्ष्य केलेले आहे. रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅपवरील चॅट व्हायरल झालेले आहेत. हे अत्यंत धक्कादायक असून त्यामधून टीआरपी घोटाळ्यामध्ये भाजपा आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘AS’ कोण आहे याचे भाजपाने आणि मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times