वाचा:
शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’तील आजच्या लेखात राऊत यांनी नामांतराच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हात घातला आहे. औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसनं नामांतरास कडाडून विरोध केला आहे. याच अनुषंगानं राऊत यांनी आपल्या लेखातून औरंगजेबाच्या इतिहासाची उजळणी करत काँग्रेसला टोले हाणले आहेत. ‘अल्पसंख्याक व्होटबँकेवर व स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, म्हणून काँग्रेसनं औरंगाबादचं होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेसची भूमिका काहीही असली तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. ‘भारताची घटना ‘सेक्युलर’ आहे, पण म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबानं शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात?,’ असा सवाल राऊत यांनी केला आहे.
वाचा:
महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेबाला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. त्याची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्यानं राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्यानं धर्माचेच राजकारण केलं. बिगर मुसलमानांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असं मानणाऱ्यांपैकी तो होता. त्याच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्यानं शिवाजीराजांना शत्रू मानलंच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारलं. अशा औरंगजेबाच्या नावानं महाराष्ट्रात तरी एखादं शहर असू नये हीच शिवभक्ती आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times