राळेगणसिद्धीत हजारे यांचे निकटवर्तीय, माजी स्वीय सहायक अशा मंडळींनी एकत्र येत स्थापन केलेल्या ग्रामविकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळाल्या आहेत. विरोधकांनी उभ्या केलेल्या शामबाबा पॅनलचा सपशेल पराभव झाला. माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, अनिल मापारी, लाभेष औटी, उद्योजक सुरेश पठारे यांच्या पॅनलने सत्ता राखली आहे.
वाचा:
नेहमीप्रमाणे गावात निवडणूक बिनविरोध करायचे ठरले होते. यावेळी आमदार नीलेश लंके यांनीही पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी निधी देण्याची योजनाही जाहीर केली होती. पहिल्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याला संमतीही झाली होती. मात्र, नंतर काही मंडळींनी हजारे यांच्याकडे जाऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. आम्हाला लोकशाही कळावी, यासाठी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. हजारे यांनीही त्यांना समंती दिली. मधल्या काळात दोन जागेवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
वाचा:
नव्याने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी शामबाबा पॅनल असे नाव देऊन पारंपरिक उमेदवारांच्या ग्रामविकास पॅनलला लढत दिली. प्रचार सुरळीत झाला, मात्र शेवटच्या दिवशी गालबोट लागले. शाम बाबा पॅनलच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मतदारांना साड्या वाटप करताना भरारी पथकाने पकडले. त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांनीही त्यांना नाकारले.
वाचा:
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा असलेल्या हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावांत यावेळी निवडणूक घेण्याची वेळ आली. त्याची राज्यभर मोठी चर्चा झाली. त्यामुळे या दोन्ही गावांतील निवडणुकांकडे लक्ष लागले होते. हिवरेबाजारमध्ये एकाधिकारशाही, दडपशाहीचे आरोप करून विरोधकांनी निवडणूक लढविली. तर राळेगणसिद्धीमध्ये लोकशाहीचे नाव पुढे करून निवडणूक लढविण्यात आली होती. मात्र, या दोन्ही गावांतील लोकांनी हे बंड मोडून काढल्याचे दिसून आले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times