रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी कन्नड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पॅनल उभं केलं होतं. त्याचवेळी आदित्य जाधव यानं आईविरोधात हर्षवर्धन जाधव यांचं पॅनल उभं केलं होतं. हर्षवर्धन जाधव यांच्या गैरहजेरीत आदित्य जाधवनं राजकारणाची सूत्र आपल्या हातात घेतल्यानं या निवडणुकांची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र, महाविकास आघाडीनं हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा पराभव केला आहे.
आदित्य हर्षवर्धन जाधवच्या पॅनलला ५ जागांवर विजय मिळाला असून संजना जाधव यांच्या पॅनलला २ जागेवर समाधान मानावं लागलं. पिशोर ग्रामपंचायतमध्ये पुंडलिक डहाके यांच्या पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला. संजना जाधव यांच्यापेक्षा आदित्य जाधवला अधिक जागा मिळाल्यानं आई पेक्षा मुलगा या निवडणूकीत सरस ठरल्याची चर्चा पिशोरमध्ये सुरू आहे.
कोण आहेत हर्षवर्धन जाधव?
हर्षवर्धन हे मनसेचे माजी आमदार आहेत. मनसे ऐन भरात असताना विधानसभेवर निवडून गेलेल्या १३ आमदारांमध्ये जाधव यांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळं मनसेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूकही जिंकली होती. मात्र, तिथंही त्यांचं जमलं नाही. त्यांनी शिवसेनेलाही रामराम ठोकला. शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढला. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times