जळगाव: (Jalgaon) जिल्ह्यातील जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालवरुन जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विजयासह वर्चस्वाचे दावे केले आहेत. दरम्यान यंदा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने जोर घेतला आहे. तर, मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा कमी झाल्याने भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का बसला आहे. in despite getting most seats)

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या एकूण जागांमध्ये भाजप १८१, शिवसेना १५९, राष्ट्रवादी १७४, काँग्रेस १४ तर स्थानिक आघाड्यांनी १५९ ग्रामपंचायतींवर झेंडा रोवल्याचे प्राथमिक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित गावनेत्यांना पराभूत व्हावे लागले आहे. तर, अनेक नवीन व तरुण चेहरे ग्रामपंचायतीच्या कारभारात दाखल झाले आहेत. अनेक पॅनलना पराभव देखील पत्कारावा लागला आहे. शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे नेते व माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आपल्या पक्षाचेच ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व असल्याचे दावे केले आहेत.

जळगाव तालुक्यात प्रस्थापितांना धक्के ; सेनेचे वर्चस्व

जळगाव तालुक्यात धक्कादायक निकाल लागले असून यात शिवसेनेसह भाजपा तालुकाध्यक्षांना कानळदा ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव सहन करावा लागला आहे. तर विधानसभा निवडणूक लढविलेल्या आसोद्यातील जिल्हा परिषद सदस्यांचे पती यांना देखील ग्रा.प निवडणूकीत पराभव पत्करावा लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जळगाव तालुक्यात ४३ पैकी २७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. त्या खालोखाल राष्ट्रवादी ९ आणि भाजपाने ५ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तर दोन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत.

एरंडोल व धरणगावात शिवसेनेची सरशी

एरंडोल तालुक्यात तालुक्यात आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत ३७ ग्रामपंचायती पैकी २० ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याचा दावा शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी केला आहे. तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आधी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यावरही सेनेने दावा केला आहे. या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे. तसेच शिवसेना नेते व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांच्या धरणगाव तालुक्यात देखील शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

बोदवडला माजी राष्ट्रपतींच्या भाचेसून पराभूत
बोदवड तालुक्यातील नाडगाव हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे गाव आहे. नाडगावमधील ग्रामपंचांयत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, प्रतिभाताई पाटील यांच्या भाचेसुनेचा निवडणुकीत पराभव झाला आहे. समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. दरम्यान या गावात कॉंग्रेसच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून, ७ पैकी केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे.

चाळीसगावात भाजपाचे वर्चस्व, पण आमदारांना धक्का

चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आमदार चव्हाण यांची सासुरवाडी असलेल्या डोण गावात भाजप पुरस्कृत पॅनलचा पराभव झाला आहे. तसेच भाजपचे किसान मोर्च्याचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पोपट भोळे यांना देखील मोठा धक्का बसला आहे. वाघळीत पोपट भोळे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. वाघळीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला ११ तर भोळे यांच्या भाजपा पुरस्कृत पॅनेलला केवळ ४ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपसाठी हा चाळीसगाव तालुक्यात मोठा धक्का मानला जात आहे. बोरखेडा व भोरस ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीत पुरस्कृत पॅनलने विजय मिळविला आहे. दडपिंपरीत भाजपाचे नाना पवार यांचे पॅनल विजयी झाले आहे. टाकळीत भाजपला विजय मिळाला आहे.

अमळनेरात तरुणांना संधी

अमळनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचाय बिनविरोध झाल्यानंतर ५० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची सोमवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत तरुणांना अनेक ठिकाणी संधी मिळाली आहे. दिग्गज व प्रस्थापित म्हणविल्या जाणाऱ्या पॅनलचा अनेक ठिकाणी पराभव झाला आहे. निंभोरा येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन सानेगुरुजी स्मारकचे कार्यकर्ते प्रा. सुनील पाटील व समाधान धनगर यांचे पॅनल विजयी झाले. ६ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांच्या गडखांब गावात बापूराव खुशाल पाटील यांचे पॅनल विजयी झाले असून त्यांना ९ जागा मिळाल्या आहेत. खवशी येथील काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांचे पॅनल पराभूत होऊन त्यांच्या विरोधातील श्यामकांत देशमुख यांचे पॅनल विजयी झाले. त्यांना ६ जागा मिळाल्या आहेत.

चोपड्यात प्रस्थापितांना धक्का; नव्या चेहऱ्यांना संधी
चोपडा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. चोपडा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत १२ टेबलावर मतमोजणी झाली. १४ फेऱ्याद्वारे ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात प्रस्थापितांना दणका तर नवीन चेहऱ्यांना संधी मतदारांनी दिली आहे.

सुनेकडून सासू पराभूत
एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत सायली राजेंद्र पाटील (२०४) या सुनबाई नी त्यांच्या चुलत सासू तथा माजी सरपंच सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांना पराभूत केले. तसेच युवा सेना तालुकाप्रमुख घनश्याम पाटील त्यांचा निवडणुकीत पराभव झाला तर त्यांच्या धर्मपत्नी वैशाली घनश्याम पाटील (१३२) या विजयी झाल्या.

क्लिक करा आणि वाचा-

राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र पाटलांचे पॅनल पराभूत

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे बोदवड तालुक्यातील मनोर बुद्रुक येथे असलेले पॅनल पराभूत झाले आहे. त्यांचा पुतण्या सम्राट पाटील हे पॅनल चे नेतृत्व करीत होते. या पॅनलला ९ पैकी केवळ एका जागेवर विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असताना देखील राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झाला. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या पत्नी प्रमिला ईश्वर इंगळे या देखील पराभूत झाल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here