औटघटकेच्या सरकारचे सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते, हा माजी मुख्यमंत्री यांचा दावा सोमवारी चर्चेचा विषय ठरला. त्यांनी हे वक्तव्य का केले आणि तेही ‘ऑफ रेकॉर्ड’… यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
उपराजधानीतील तरुण उद्योजक, व्यावसायिकांच्या जनरेशन नेक्स्ट ‘एन्टरप्रेनर फोरम’ने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आयोजित केली होती. आधी ठरल्याप्रमाणे ही मुलाखत ‘ऑफ रेकॉर्ड’ होती. कुठेही प्रसारण होऊ नये व चर्चा होऊ नये, यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. केवळ निवडक निमंत्रितांनाच प्रवेश होता. प्रवेशाच्यावेळीच सर्वांचे मोबाइल बंद करण्यात आले. सव्वा वर्षापूर्वी ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते. त्यासाठी काय-काय घडामोडी झाल्या, कोण सूत्रधार होते, कशी व्यूहरचना आखण्यात आल्यापासून ते मंत्रिमंडळाच्या यादीपर्यंत फडणवीस यांनी मनमोकळी उत्तरे दिली. त्यावेळी प्रत्यक्षात फेसबुक लाइव्ह सुरू होते. हे लक्षात येईपर्यंत त्यांच्या शाब्दिक बाणांनी भेद साधला होता. सूचक संदेश व्हायरल झाला. कार्यक्रम लाइव्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर लिंक डिलिट करण्यात आली असली तरी, याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
‘शिवसेनेसोबत चर्चा सुरू असताना त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यामुळे आम्ही अनेक पर्यायांची चाचपणी करून राष्ट्रवादीशी संवाद सुरू केला. त्यानुसार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. खातेवाटप, जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित करण्यात आले होते’, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात केला.
नवीन समीकरणाचे संकेत?
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याच टीमकडून लाइव्ह सुरू असल्याचे लक्षात येताच लिंक हटवण्यात आली. तोपर्यंत योग्य निशाणा साधला गेला होता. सर्वांचे मोबाइल बंद व मीडियाच्या एकाही प्रतिनिधीला प्रवेश नाही, असे असताना फेसबुक लाइव्ह कसे लक्षात आले नाही? या माध्यमातून मुद्दाम सूचक संदेश द्यायचा होता की या माध्यमातून नवीन समीकरणाचे संकेत देण्याचे प्रयत्न झाले, यावर तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times