अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील संभाषणाचा तपशील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संभाषणात अनेक धक्कादायक तपशील असून २०१९मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबतही अत्यंत संवेदनशील असे संभाषण यात आहे. यावरुन गेले काही दिवस मोठं वादळ उठलं आहे. रोहित पवार यांनीही नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे.
‘लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता य कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या नेत्यांनी सांगावे,’ असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
तसंच, ‘फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, यही पूछता है भारत,’ असंही पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत या संदर्भात काय कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times