शरजील इमाम हा मूळचा बिहारमधील असून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याचा कसून शोध सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून दिल्लीसह पाटणा व मुंबईत पथके पोहचली आहेत. आज अनेक ठिकाणांवर या पथकांनी शोध घेतला. मात्र शरजील अद्याप हाती लागलेला नाही.
शाहीन बागेत आयोजित करण्यात करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शरजील होता. तेथे त्याने दोन धर्मांत तेढ वाढवणारे प्रक्षोभक भाषण केले, असा आरोप ठेवून त्याच्यावर विविध कलमांखाली रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये १६ जानेवारी रोजी केलेल्या भाषणावरूनही शरजील गोत्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध या भाषणामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसाम पोलिसांनीही त्याच्याविरुद्ध दहशतवाद विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शरजील हा जेएनयूत पीएचडी करत असून विद्यापीठ प्रशासनानेही त्याच्याविरुद्ध कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जेएनयूच्या शिस्तपालन अधिकाऱ्यांमार्फत शरजीलला समन्स बजावण्यात आले आहे. शिस्तपालन समितीपुढे ३ फेब्रुवारीच्या आत हजर राहावे व प्रक्षोभक भाषणांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
शरजीलच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल
शरजीलचा हिंसेला चिथावणी देणाऱ्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ‘दिल्लीचे जनजीवन विस्कळीत व्हावे ही आमची इच्छा आहे. दिल्लीच नव्हे तर जगातील प्रत्येक शहरात चक्काजाम झालाच पाहिजे. देशातील अनेक शहरांत मुस्लिम लोक चक्काजाम करू शकतात. मुस्लिमांकडे तेवढी ताकद नाही का? उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ३० टक्के आहे. तुमची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे तर या शहरांचे जनजीवन सुरळीत कसे सुरू आहे? तुम्ही शहरात राहणारे आहात, तर शहरे बंद करा’, अशी चिथावणी शरजील देत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times