आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या दप्तर दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवकांना कारवाईचा दणका दिला. या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी अॅड. हरुल देवरे यांनी सांगितले की, संबंधित ग्रामसेवकांनी सन २०१५ पासून ते सन २०२० पावेतोचे शासकीय दप्तर बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवले होते. सरकारी दप्तर जमा करण्यासाठी त्यांना वेळोवेळी संधी देण्यात आली, तरीही त्यांनी दप्तर दिले नाही. म्हणून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली आहे.
या ग्रामसेवकांवर झाली कारवाई
राहुल नारायण पाटील (चिंचखेडा सीम, ता. बोदवड, जि. जळगाव), सुभाष रामलाल कुंभरे, (धौडखेडा, ता. बोदवड, जि. जळगाव), सुरेश दत्तात्रय राजहंस (वरखेड, ता. बोदवड, जि. जळगाव), गणेश रामसिंग चव्हाण (जुनोने दिगर, ता. बोदवड, जि. जळगाव), नंदलाल किसन येशिराया (लोंजे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), डी. एस. इंगळे (वडजी, ता. बोदवड, जि. जळगाव) अशी कारवाई झालेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत.
यांना दिली चार दिवसांची मुदत
या पैकी डी. एस. इंगळे यांच्याकडे असलेल्या दप्तराचा पंचनामा करण्यात आला असून, ते हस्तांतरित करण्यात आले. परंतु, त्यांच्याकडे अजूनही काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे बाकी आहेत. त्यांनी दिलेल्या वैद्यकीय कारणाचा विचार करून त्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी ४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या दोघांना होणार दिसताक्षणी अटक
याच प्रकरणात विनायक चुडामण पाटील (झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) व अनिल कचरू जावळे (डोणगाव, ता. धरणगाव जि. जळगाव) हे दोन ग्रामसेवकही रडारवर आहेत. ते कर्तव्यावर गैरहजर असल्याने त्यांच्यावरील कारवाई तूर्त टळली असली तरी कारवाईची टांगती तलवार कायम आहे. दिसताक्षणी त्यांना अटक करून त्यांच्याकडून सरकारी दप्तर ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
५० हजारांचा दंड
कारवाई करण्यात आलेल्या सर्व ग्रामसेवकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आदेश असून, सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करून विभागीय चौकशी पारित करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times