ऑस्ट्रेलियातील विजयानंतर भारतीय संघाचा हा कर्णधार जेव्हा घरी आला तेव्हा त्याचे जंगी स्वागत झाले. यावेळी अजिंक्यच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी एक खास केक आणला होता. या केकमध्ये एक खेळपट्टी बनवण्यात आली होती. त्यामध्ये एक कांगारु तिरंगा हातामध्ये घेऊन बसा होता. हा केक भारताने ऑस्ट्रेलियावर कसा विजय मिळवला, हे दर्शवित होता. पण रहाणेने यावेळी हा केक कापण्यास नकार दिला. त्यानंतर काही जणांनी या केकमधील कांगारु तरी काप, अशी विनवणी अजिंक्यला केली. पण अजिंक्यने हा केक कापला नाही.
हा केक कापून ऑस्ट्रेलियाचा अपमान होईल, असे अजिंक्यला वाटत होता. त्यामुळे अजिंक्यने हा केक शेवटपर्यंत कापला नाही. अजिंक्यच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये शिवीगाळ झाली होती. त्याचबरोबर काही खेळाडूंवर वर्णद्वेषी टीकाही झाली होती आणि पंचांनी भारतीय खेळाडूंना मैदान सोडण्यासही सांगितले होते. हे सर्व वाईट प्रकार घडूनही अजिंक्यने यावेळी ऑस्ट्रेलियाचा सन्मान केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या या एका कृतीमधून अजिंक्यने क्रिकेट विश्वातील चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
अजिंक्यचे पुष्पवर्षाव, तुतारीने त्याचे स्वागत करण्यात आले. सोबत ढोल-ताशे होतेच. अजिंक्य सोसायटीमध्ये येताच तुतारी वाजवण्यात आली आणि त्याच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. उपस्थित सोसायटीमधील लोकांनी ‘वेल डन अजिंक्य’ म्हणत त्याचे स्वागत केले. त्यानंतर ‘आला रे आला अजिंक्य’ आला अशा घोषणा दिल्या. सहा महिन्यांनी अजिंक्य घरी आला तेव्हा त्याने सर्व प्रथम हातात घेतले ते आपल्या लेकीला, सोबत पत्नी होतीच. अजिंक्य आयपीएलसाठी युएईला गेला होता. त्यानंतर तेथून ऑस्ट्रलियाला गेला. इतक्या दिवसानंतर त्याने प्रथमच मुलीला समोर पाहिले. भारतीय आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या या कामगिरीचे कौतुक संपूर्ण जग करत आहे. असा खेळाडू आपल्या जवळ राहतो ही देखील गौरवाची गोष्ट माननाऱ्या त्याच्या शेजाऱ्यांनी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करून मन जिंकले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times