नटराजनने भारतामध्ये दाखल झाल्यावर पत्रकारांना सांगितले की, ” ऑस्ट्रेलियामध्ये मला एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. कारण ऑस्ट्रेलियामध्ये मी फक्त सराव गोलंदाज म्हणून गेलो होतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये मला खेळण्याची संधी मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. पण जेव्हा मला समजले की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मला मिळत आहे, तेव्हा मी अधिक दडपणाखाली आलो होतो. पण त्याचवेळी माझे भारतासाठी खेळण्याचे स्वप्नही साकार होत होते.”
भारताला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पराभव स्विकारावा लागला. पण त्यानंतर झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताला विजय मिळाला होता. नटराजनला यावेळी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही पदार्पण करण्याची संधी दिली होती. नटराजनने या मालिकेत कमाल केली. त्यामुळे मालिका विजयानंतर हार्दिक पंड्याला मिळालेला पुरस्कार त्याने नटराजनला दिला होता.
नटराजनने पुढे सांगितले की, ” आम्ही ट्वेन्टी-२० मालिका जिंकलो होतो. त्यांनतर कर्णधार विराट कोहलीने मालिका विजयाचा चषक माझ्या हातामध्ये दिला होता. त्यावेळी माझे डोळे पाणावले होते. मी त्यावेळी भावुक झालो होतो. कारण माझ्यासारख्या नवख्या खेळाडूच्या हातामध्ये कर्णधाराने जेतेपदाचा चषक दिला होता. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय असाच क्षण होता. कारण जेतेपदाचा चषक माझ्या हातामध्ये होता.”
नटराजनने यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये एकच धमाल उडवून दिली. कारण ट्वेन्टी-२० मालिकेत नटराजनने भन्नाट कामगिरी केली होती. नटराजनच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपयशी ठरताना दिसत होते. त्याचबरोबर कसोटी मालिकेतही नटराजनने दमदार कामगिरी केली. अखेरच्या कसोटीमध्येही नटराजनने अचूक गोलंदाजी करून संघाला महत्वाचे विकेट्स मिळवून दिले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times