दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारात आज ८ बसेस १७ गाड्यांची तोडफोड केली गेली. या प्रकरणी ४ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनी अत्यंत हिंसक मार्गाने ही ट्रॅक्टर परेड काढली, असा आरोप दिल्ली पोलिसांचे सहआयुक्त (पूर्व रेंज) आलोक कुमार यांनी केला. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले. तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शांतता बाळगावी. आणि ठरलेल्या मार्गाने त्यांनी परत जावं, असं आवाहन दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी केलं. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत अनेकदा चर्चा केल्यानंतर ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग आणि वेळ निश्चित करण्यात आली होती. पण शेतकऱ्यांनी नियोजित मार्गावरून ट्रॅक्टर न नेता इतर रस्त्यांवरून घुसवले आणि वेळीआधीच ट्रॅक्टर रॅली सुरू केली गेली, असं श्रीवास्तव म्हणाले.
अनेक ठिकाणी तोडफोड: पोलिस
आंदोलकांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली आणि त्यात अनेक पोलिस जखमी झाले. सार्वजनिक मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे, असं श्रीवास्तव यांनी सांगितलं. शेतकरी नेत्यांशी संवाद साधताना मार्ग निश्चित करण्यात आले. पण मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता एका गटाने बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला आणि गाझीपूर सीमेवर पोलिसांशी पहिली झटापट झाली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण अत्यंत उग्र प्रकारे पोलिसांवरच ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न झाला. रॅली दरम्यान मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि नुकसान झालं आहे. यासर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं सहआयुक्त अलोक कुमार म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times