नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड तोडली, पोलिसांशी झटापट आणि नियोजित मार्गावरून न जाता वेगवेगळ्या मार्गावर ट्रॅक्टर घुसवल्याच्या बातम्या दिवसभर चर्चेत राहिल्या. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराची गंभीर दखल घेतली आहे. तसंच त्याविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

ट्रॅक्टरच्या पारेडमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर केंद्रीय गृहसचिवांनी गृहमंत्री अमित शहा ( ) यांना दिल्लीतील सद्यस्थितीबद्दल माहिती दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून रात्री उशिरा या प्रकरणात मोठी कारवाई केली जाऊ शकते, असं सांगण्यात येत आहे. अनेक शेतकरी नेते रडारवर आहेत. ट्रॅक्टर परेडनंतरही सिंघू सीमेवर एकही प्रमुख नेता दिसून आलेला नाही. शेतकऱ्यांनी अतिशय उग्र आंदोलन आणि हिंसक आंदोलन केलं. यात ८६ पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

राजधानीत अतिरिक्त जवान तैनात

हिंसाचाराची घटना गांभीर्याने घेत केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राजधानी दिल्लीत निमलष्करी दलाचे अतिरिक्त जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. शांतता कायम ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त केंद्रीय दलांची तैनाती करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. त्याचबरोबर दिल्लीला लागून असलेल्या हरयाणातील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने इंटरनेट आणि एसएमएस सेवेवरील बंदी वाढवली आहे. अफवा पसरवण्यापासून रोखण्यासाठी सरकारने बुधवारी संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत सोनीपत, पलवल आणि झज्जर जिल्ह्यात इंटरनेट आणि एसएमएस सेवावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

इंटरनेट सेवा बंद

हरयाणाच्या तीन जिल्ह्यांव्यतिरिक्त रात्री १२ वाजेपर्यंत आंदोलन सुरू असलेल्या सर्व सीमाभागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सिंघू, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई आणि आसपासच्या भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. सरकारच्या सूचनेनुसार पुढील माहितीपर्यंत तुमच्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मोबाइल इंटरनेट सेवा मात्र सुरू आहे, असा मेसेज कुठलीही यूआरएल उघडल्यावर दिसत आहे.

ट्रॅक्टर रॅलीत गोंधळ

शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेड बोलावली होती. त्यासाठी दिल्ली पोलिसांशी झालेल्या बैठकीनंतर ट्रॅक्टर परेडचे मार्ग निश्चित करण्यात आले होते. पण मंगळवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड सुरू होताच हिसांचार सुरू झाला. दुपारी मोठ्या संख्येने आंदोलक ट्रॅक्टरसह लाल किल्ल्यावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि गडाच्या तटबंदीवरुन पिवळा ध्वज फडकावला. राजधानीतील आयटीओमध्ये आंदोलक शेतकर्‍यांनी ट्रॅक्टरने बॅरिकेड्स तोडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.

रात्री उशिरापर्यंत अनेक आंदोलक किल्ल्याच्या आत उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना आता किल्ल्याबाहेर काढलं आहे. ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर आता संयुक्त किसान मोर्चाने ट्रॅक्टर परेड संपल्याची घोषणा केली आहे. यासह त्यांनी सहभागींना झालेल्यांना आपल्या ठिकाणावर परतण्याचं आवाहन केलं. हिंसा करणारे घुसखोर होते, असा दावा ४० शेतकरी संघटनांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here