वाचा:
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. तेव्हापासून त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. मागील दोन आंदोलनांच्यावेळी देण्यात आलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, हा प्रमुख आक्षेप हजारे यांचा आहे. गेल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये आले होते. त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडून आलेल्या एका प्रस्तावाचे पत्र हजारे यांना दिले. हे पत्र जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, हजारे यांच्या मागण्या, त्यावर त्यांना सरकराने दिलेले आश्वासन, मधल्या काळात त्यातील मार्गी लागलेले मुद्दे आणि नजिकच्या काळात त्यासाठी सरकारकडून उचलण्यात येणारी पावले, याबद्दलचा प्रस्ताव देण्यात आल्याचे समजले. यावर आता हजारे यांनी सूचना कराव्यात, काही बदल असतील तर ते सूचवावेत त्यावर वरिष्ठ पातळीवर विचार होऊन निर्णय घेतला जाईल. त्याआधारे हजारे यांना उपोषण मागे घेण्यासंबंधीचा प्रस्ताव देताना ठोस आश्वासने आणि कार्यवाहीचा प्रस्ताव दिला जाणार आहे. येत्या एक दोन दिवसांत ही प्रक्रिया होणे अपेक्षित आहे.
वाचा:
यासंबंधी मध्यस्थी करण्यासाठी डॉ. विखेही राळेगणसिद्धीला गेले होते. यावर बोलताना ते म्हणाले, ‘अण्णांच्या सर्व मागण्या आणि त्यांचे नेमके म्हणणे काय हे आम्ही ऐकून घेतले आहे. त्याची सर्व माहिती केंद्र सरकारला कळविण्यात आली. त्यानंतर कृषिमंत्र्यांचा एक प्रस्ताव हजारे यांना देण्यात आला आहे. आता त्यावर हजारे यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. आम्ही आमचे काम केले. हजारे यांचा चर्चेवर विश्वास असल्याने ते यावर उत्तर देतील आणि तोडगा निघेल असा विश्वास वाटतो,’ असेही विखे म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हजारे यांनी कृषिमंत्र्याच्या पत्राचे अवलोकन करून त्यांना उत्तर देण्याची तयारी केली आहे. आज किंवा उद्या ते उत्तर देणार आहेत. आपल्या मागण्यांवर हजारे ठाम असले तरी पत्रातून आणखी काही सूचना ते सरकारला कळवू शकतात. फडणवीस यांच्या भेटीनंतर यावर सविस्तर भाष्य करणे हजारे यांनी टाळले आहे. भाजपच्या मते हजारे यांना ठोस प्रस्ताव दिला असून त्यावर सहमती होऊ शकते, अशी आशाही व्यक्त केली जात आहे. पूर्वीही हजारे यांनी असाच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन मध्यस्थी करीत होते. त्यामध्ये शेवटच्या दिवशी तोडगा काढण्यात यश आले होते. त्यामुळे ऐनवेळी उपोषण टळले होते. हा अनुभव पाठीशी असल्याने भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
वाचा:
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाल्यानंतर सगळेच सावध झाले आहेत. सरकारकडून हजारे यांच्या आंदोलनासंबंधीही दक्षतेने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे हजारे यांच्याकडूनही सावध भूमिका घेतली जात असून आंदोलनाची वेळ आलीच तर ते कसे असावे, यासंबंधी कार्यकर्ते, समर्थकांना योग्य त्या सूचना केल्या जाणार आहेत. आंदोलन बदमान करण्याचा प्रयत्न होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. दिल्लीतील आंदोलनावर सडेतोड भूमिका मांडल्यानंतर स्वत: हजारेही यासंबंधी सावध झाले आहेत. उपोषणाची वेळ आलीच तर सुरुवातीला तरी ते एकटेच यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे त्यासंबंधीची तयारी अद्याप तरी सुरू झालेली नाही. याशिवाय त्यांची राज्यातील आणि देशातील यंत्रणाही अद्याप या संबंधाने सक्रिय करण्यात आलेली नाही. पुढील दोन दिवसांत मात्र वेगवान हालचाली होण्याची शक्यता आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times