दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
‘दिल्लीच्या कालच्या घटनेत पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आले, तेव्हा त्यांच्याविरोधात चकार शब्द कोणी काढला नाही. रोज वचवच करणारे संजय राऊत पोलिसांच्या बाजूनं का बोलले नाही. तर, कधीकाळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूनं का आली नाही? सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा जो वावर आहे त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंड आता का शिवली आहेत? असा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्यावतीने विचारत आहोत,’ असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
वाचाः
‘केंद्र सरकारने २०१५ पासून २०२० पर्यंत जो जनहिताचा निर्णय घेतला. लाँगमार्च ते लाँग आंदोलन, पुरस्कार वापसी ते पुरस्कार वापसी करणाऱ्यांचे समर्थन हीच सातत्याने भूमिका शहरी नक्षलवाद्यांनी घेतली आहे. केवळ राजकीय सूडापोटी व मोदी द्वेशापायी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अराजकता आणू पाहते,’ असा आरोप शेलारांनी केला आहे.
‘दिल्ली पोलिसांनी सगळ्यांनी जो संयम दाखवला तो त्यांच्या देशभक्तीचा नजारा होता. केंद्र सरकार आंदोलनाला ज्या संयमाने सामोरं गेलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. विरोधकांना गोळीबार हवा होता का? आंदोलन चिघळलं होतं का? त्यामुळं माथी भडकवण्याचं काम शरद पवारांकडून अपेक्षित नाही,’ असा गंभीर आरोप यावेळी शेलार यांनी केला.
वाचाः
‘पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं, पोलिसांवर लाठ्या उचलणं, जवानांना लाथा बुक्क्याने मारणं हे कोणत्या देशभक्तीत बसतं हे पवार साहेब आणि संजय राऊतांनी स्पष्ट करावं,’ असं नमूद करतानाच ‘ज्यांनी या आंदोलनाला समर्थन दिलं याची चौकशी करावी,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times