वाचा:
शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून अण्णा हजारे यांच्या स्थगित झालेल्या आंदोलनावर तिरकस भाष्य करण्यात आलं आहे. ‘अण्णांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढायचं आणि नंतर ते म्यान करायचं असं यापूर्वीही घडलं आहे. त्यामुळं आताही ते घडलं तर त्यात अनपेक्षित असं काही नाही. भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळं अण्णांचं समाधान झालं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न कृषी कायद्याची दहशत आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील दडपशाहीचा आहे. या संदर्भात अण्णा निर्णायक भूमिका घेत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र अण्णांनी उपोषण मागं घेतलं आहे. त्यामुळं कृषी कायद्यांबाबत त्यांची नेमकी भूमिका काय हे तूर्त तरी अस्पष्टच आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
अण्णांच्या उपोषण स्थगितीवर म्हणते…
>> लाखो शेतकरी साठ दिवसांपासून सरकारशी संघर्ष करीत आहेत. सरकार आता त्यांचं आंदोलन चिरडायला निघालं आहे. वीज, पाणी, अन्नधान्याची रसद कापली आहे. शेतकऱ्यांविरोधात ‘लुकआऊट’ नोटीस बजाविण्यात आली आहे. हे धक्कादायक आहे. अण्णा हजारे यांचे या घडामोडींवर नेमके काय मत आहे?
>> मुळात उपोषणाचा इशारा देण्यामागचा अण्णांचा नेमका हेतू काय होता? कृषी कायदे रद्द करावेत असं आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अण्णा हजारे यांचं उपोषण शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी होतं काय हे स्पष्ट झालेलं नाही. तसं असतं तर त्यांना मोदी सरकारविरोधात उघड भूमिका घ्यावी लागली असती. राळेगणमध्ये मनधरणीसाठी येणाऱ्या भाजपच्या पुढाऱ्यांना तसं स्पष्ट शब्दांत सांगावं लागलं असतं.
वाचा:
>> मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णांनी दोन वेळा दिल्लीत जंगी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचं काम तेव्हा भाजप करीत होता, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळं जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय?
>> अण्णा माजी सैनिक आहेत. देशाच्या बॉर्डरवर सैनिकांची स्थिती आज नक्की कशी आहे? चिनी सैन्यानं भारताची जमीन बळकावली आहे. हा विषय अण्णांसारख्या समाजधुरिणांनी सरकारला जाब विचारावा असाच आहे, पण अण्णा आज एकाकी पडले आहेत. राजकीय पक्षांनी त्यांना वेळोवेळी वापरून घेतलं. त्यात अण्णांच्या शरीराची प्रचंड झीज झाली. उपोषण करणं व ती पुढे रेटणं ही साधी गोष्ट नाही. मागच्या उपोषणाचे परिणाम अण्णांच्या शरीराच्या अनेक अंगांना भोगावे लागत आहेत. पण अण्णांनी एखादे आंदोलन छेडणे यास आजही महत्त्व आहेच.
>> अण्णा हजारेंनी उघडपणे भूमिका घेण्याची गरज आहे. ९०-९५ वर्षांचे शेतकरी गाझियाबादच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अशा वयोवृद्ध शेतकऱ्यांना नैतिक बळ देण्यासाठी आता अण्णांनी उभं राहायला हवं. राळेगणात बसून भाजप पुढाऱ्यांबरोबर सोंगट्या खेळण्यात आता हशील नाही. प्रसंग युद्धाचाच आहे व युद्ध आता गावातून व मंदिरातून होणार नाही. मैदानात उतरावे लागेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times