पुणे: काँग्रेस नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नोटबंदीपासून देशात भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण सुरू असून या घसरणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप डॉ. मुणगेकर यांनी केला आहे. मोदी सरकार हे केवळ घोषणांच्या बळावर जगलेले भारताच्या इतिहासातील एकमेव सरकार असल्याचेही डॉ. मुणगेकर यांनी म्हटले आहे.

अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उद्याच्या अर्थसंकल्पाबाबतही भाष्य केले आहे. उद्याच्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ठोस तरतुदी असण्याची शक्यता नसल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले. सलग तीन वर्षे आर्थिक वृद्धीचा दर उणे असणारा भारत हा एकमेव देश असल्याचेही ते म्हणाले. देशाची क्रयशक्ती वाढवण्यासाठीही सरकारने काहीही केले नसून मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गंभीर नसल्याचेही डॉ. मुणगेकर म्हणाले.

‘सरकारने बाऊ न करता कृषी कायदे मागे घ्यावेत’

केंद्र सरकारने कोणताही बाऊ न करता नवे कृषी कायदे मागे घ्यावेत, असे आवाहनही डॉ. मुणगेकर यांनी केंद्र सरकारला केले आहे. सरकारच्या प्रतिष्ठेपेक्षा जनतेची प्रतिष्ठा महत्वाची आहे. एमएसपी काढण्यानंतर कायदेशीर हमी न दिल्यास देशातील कृषी क्षेत्र उद्ध्वस्त होईल, अशी भितीही डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलताना डॉ. मुणगेकर यांनी सरकारला पंजाबमध्ये पुन्हा खलिस्तान घडवायचे आहे का?, असा सवालही उपस्थित केला. लाल किल्ल्यावर इतका बंदोबस्त असताना सिद्धू तेथे पोहोचलाच कसा?, असा सवाल करताना, हे शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here