करोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आला असला तरी अद्यापही करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळं लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु होत असली तरी फेस मास्क, सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टनसिंग वापरण्याच्या सूचना वेळोवेळी होत असतात. मात्र, तरीही या सूचनांकडे प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय.
वाचाः
सर्वांना लोकल प्रवासांची मुभा देण्यात आली असली तरी लोकल प्रवासासाठी काही वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसंच, या वेळेचं बंधन नागरिकांनी पाळलं नाही तर शिक्षा व दंडही आकारण्यात येत आहे. लोकल आज सुरु होताच रेल्वे तिकिट खिडक्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी, बोरिवली या तिकीटघरातील सर्व एन्ट्रन्स प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहेत. जेणेकरुन अधिक गर्दी होणार नाही. त्याचबरोबर विनातिकीट प्रवास करु नये यासाठी प्रत्येक स्थानकात टीसीचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानकांवर गर्दी विभागण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील ३०१ तिकिट खिडक्या ६४२ शिफ्टमध्ये सुरु राहतील. पश्चिम रेल्वेवरील सर्व एटीव्हीएम सुरु करण्यात येतील. सर्व स्थानकांतील सरकते जिने, लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. स्थानकांतील १९८ प्रवेशद्वार खुले करण्यात येतील. यामुळे स्थानकात प्रवेश करण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. सध्या ८६ प्रवेशद्वार खुले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली आहे. तरीही काही ठिकाणी सोशल डिस्टनसिंगच्या निमयांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. तसंच, वेळेचं बंधन पाळलं नाही तर २०० रुपये दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास या शिक्षेचा सामना करावा लागणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times