मुंबई: कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर काही संघटनांनी माघार घेतल्यामुळं आंदोलन थंडावेल असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा या आंदोलनानं जोर पकडला आहे. शिवसेनेनंही आता या आंदोलनाला नैतिक बळ देण्याचं ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेचे खासदार आज सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. ( MP )

वाचा:

संजय राऊत यांनी स्वत: ट्वीट करून आज ही माहिती दिली आहे. ‘महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री हे आजवर प्रत्येक सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत,’ असं राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. किसान आंदोलन झिंदाबाद… ‘जय जवान, जय किसान’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानंतर शिवसेनेनं सतत त्यांना पाठिंबा दिला आहे. मोदी सरकारनं एक पाऊल पुढं येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. लडाखमध्ये घुसखोरी करून ठाण मांडून बसलेल्या चिनी सैन्याशी सरकार चर्चा करते, पण आपल्या न्याय्य हक्कांसाठी दोन महिने सनदशीर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घुसखोर, खलिस्तानी ठरवते, हे दुर्दैवी आहे, असं शिवसेनेनं ‘सामना’तून म्हटलं होतं. आता शिवसेनेनं एक पाऊल पुढं टाकायचं ठरवलं असून शिवसेनेचे नेते आज शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here