मुंबई महानगरपालिकेया निवडणुकीसाठी भाजपनंही कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं भाजपसोबत युती तोडत काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यानंतर, भाजपनं शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका हाती घेतली आहे. तसंच, मुंबई महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून असलेली शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपनंही मिशन मुंबई राबवलं आहे. तर, महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्याचा निर्धारही केला आहे. तर, एकीकडे शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी मोहिम आखण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेनं मुंबईतील गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी काही दिवसांवर मुंबई मा जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, अशी टॅगलाइन देत गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला गुजराती बांधवांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेकडून आणखी एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी ७ फेब्रुवारी रोजी मालाड येथे मेळावा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात रासगरबाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच. याचवेळी २१ गुजराती उद्योजक आणि व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पालिका निवडणुकीच्या आधी शिवसेनेनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करुन मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times