वाचा:
मनसेचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेते शिवसेनेवर सातत्यानं टीका करताना दिसतात. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून टीकेची ही धार दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर मनसेचे नेते रोजच्या रोज हल्ले चढवत असतात. मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यात आघाडीवर असतात. देशपांडे यांनी आज देखील पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर खंडणीखोरीचे आरोप केले. शिवसेना ही फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणारा आकार… असं या पावतीवर लिहिण्यात आल्याचं देशपांडे यांनी आज निदर्शनास आणलं. एका ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेनेला ‘विरप्पन गँग’ असंही म्हटलं होतं.
वाचा:
शिवसेनेचे युवा नेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत, पण बोचरी प्रतिक्रिया दिली. ‘ हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे हेच मला कळत नाही. ही ‘टाइमपास टोळी’ आहे असंच म्हणावं लागेल. ह्यांच्याकडं स्वत:चे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळं आपणही लक्ष देण्याची गरज नाही,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
वाचा:
अध्यक्ष राज ठाकरे वगळता मनसेच्या कोणत्याही नेत्याच्या टीकेला शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांकडून शक्यतो उत्तर दिलं जात नाही. आदित्य ठाकरे यांनीही आजवर अशा टीका टिप्पणीला उत्तर देणं टाळलं आहे. आजही त्यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. मनसेकडं फार लक्ष देण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसेकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times