अमित शहा, अजित डोवल आणि एस.एन. श्रीवास्तव यांच्यात सुमारे दोन तास बैठक चालली. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची बैठक सुरू झाली. ती संध्याकाळी जवळपास ७ वाजेपर्यंत सुरू होती. ही बैठक कुठल्या मुद्द्यावर झाली हे मात्र कळू शकले नाही. पण ही बैठक तातडीने झाल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आता पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आणि पॉप सिंग रिहाना यांच्या पाठिंब्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. दुसरीकडे आंदोल शेतकऱ्यांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्काजाम’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यात संसदेत विरोधकांनी शेतकरी आंदोलनावरून सरकारला घेरलं आहे. राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत तहकूब केलं गेलं आहे. तर लोकसभेचं कामकाज याच मुद्द्यावरून दोन वेळा तहकूब झालं आहे. यामुळे गृहमंत्री अमित शहांनी बोलावलेल्या बैठकीला महत्व आलं आहे.
राहुल गांधींची विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक
शेतकरी आंदोलनावरून संसद आणि संसदेबाहेर सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. विरोक्षी पक्षांच्या आमदारांनी गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना त्यांना भेटू न दिल्याने ते परतले. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक झाली. शिवसेना, डीएमके, माकप, भाकप, आप आणि इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
PM मोदी सोमवारी राज्यसभेत बोलणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरवात झाली होती. आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी ८ तारखेला म्हणजे येत्या सोमवारी धन्यवाद प्रस्तावावर सरकारची भूमिका मांडतील. त्या पूर्वी शनिवारी आणि रविवारी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते दोन दिवस माध्यमांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पावर ते माध्यमांसमोर सरकारची भूमिका स्पष्ट करतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times