विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आतच नाना पटोलेंची नियुक्ती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये आक्रमक नेता अशी ओळख मिळवण्यापूर्वी नाना पटोलेंनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. नाना पटोलेंच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला आढावा.

यांनी पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवली होती. विदर्भातील ओबीसी नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. नाना पटोलेंना त्यांच्या पहिल्याच निवडणूकीत भाजपकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर, १९९९ आणि २००४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

२०१४मध्ये पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली होती. भंडारा- गोंदिया मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. २०१७मध्ये त्यांनी भाजपला रामराम करुन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये भाजपमध्ये असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला ठाम विरोध केला होता. पंतप्रधान मोदींविरोधात बोलणारे ते पहिलेच भाजपचे नेते होते.

वाचाः

काँग्रेसमध्ये पुन्हा आल्यानंतर नाना पटोले यांनी २०१९मध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकांवेळी साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद आणि काँग्रेसकडे विधानसभाअध्यक्ष पद असं खातेवाटप करण्यात आलं. यावेळी, काँग्रेसकडून विधानसभाअध्यक्ष पदासाठी नाना पटोलेंचं नाव निश्चित करण्यात आलं. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडे केली होती. काँग्रेस हायकमांडनं त्यांच्या या मागणीचा गांभीर्यानं विचार करत नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरु केल्या.

वाचाः

गेले काही दिवस या पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांचेही नाव यात होते. अखेरच्या क्षणी अमित देशमुख यांचंही नाव पुढं आलं होतं. मात्र, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरच ही जबाबदारी येणार हे स्पष्ट झालं होतं. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं.

दरम्यान, भाजपमध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळं नाना पटोले चर्चेत आले होते. त्यांचा याच आक्रमकपणामुळं महाराष्ट्रात काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करता येणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here