वाचा:
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद वाढल्याने त्याचे सारे श्रेय , नितेश राणे आणि निलेश राणे यांना दिले गेले. या यशामुळे राणे यांची भाजपमधील पतही वाढली. राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वानेही या यशाची दखल घेतली. मुख्य म्हणजे राणे यांच्या खास आग्रहावरून देशाचे गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले. राणे यांनी कसाल पडवे येथे उभारलेल्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन रविवारी शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी केलेल्या भाषणात शहा यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार प्रहार केला. शहा यांच्या भाषणाने सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचेही चित्र आहे. नेमकी हीच वेळ शिवसेनेने साधली व शहा यांची पाठ फिरताच राणेंचे वर्चस्व असलेल्या वैभववाडीत भाजपला मोठा धक्का दिला आहे.
वाचा:
नितेश राणे यांच्या कणकवली मतदारसंघात असलेल्या वैभववाडी नगरपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे १७ पैकी १७ नगरसेवक भाजपचे असून यातील सात नगरसेवकांनी सोमवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संपदा राणे, रवींद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर, संतोष पवार अशी या सात नगरसेवकांची नावे असून आणखी काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. या नगरपंचायतीची निवडणूक लवकरच होणार असून त्याआधीच भाजपला मोठे खिंडार पडल्याने सगळीच गणितं बदलून गेली आहेत. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हे सातही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीशीर माहिती आहे. हे सात नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होईल व हे सातही नगरसेवक शिवबंधनात अडकतील, असे सांगण्यात आले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे आमच्या सात नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची कोणतीही माहिती मला नसल्याचा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी केला.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times