पाहा :
वाचा :
LIVE घडामोडी :
– ९ राज्यांमधील ११५ जण बेपत्ता, यादी जाहीर. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक जण बेपत्ता. उत्तराखंडमधील ४२, उत्तर प्रदेशातील ४६, झारखंड १३, पंजाब ४, बिहार ३, पश्चिम बंगाल २, जम्मू काश्मीर १, ओडिशा १ आणि नेपाळमधील ३ नागरिकांचा समावेश
– उत्तराखंडमधील दुर्घटनेतर मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय बैठक घेतली आहे. 1070 हा टोल फ्री क्रमांक आणि 9454441036 हा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. हरीद्वारमध्ये कंट्रोल रूम स्थापन करण्याचे आदेशः एके अवस्थी, सचिव, उत्तर प्रदेश
– रात्री ८ वाजेपर्यंत २६ मृतदेह हाती, अजून १७१ जण बेपत्ता. बोगद्यात जवळपास ३५ जण अडकल्याची भीतीः अशोक कुमार, उत्तराखंडचे डीजीपी
– आतापर्यंत विविध ठिकाणांहून एकूण २४ जणांचे मृतदेह हाती आले, उत्तराखंड पोलिसांची माहिती
– NDRF, SDRF आणि लष्कराच्या संयुक्त पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. आणखी जवळपास २ ते ३ तास लागतील योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी. बोगद्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेतः त्रिवेंद्रसिंह रावत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री
– आपत्तीनंतर बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत जोशीमठ येथे पोहोचले. बचावकार्याचा घेतला आढावा
– उत्तराखंडमधील आपत्तीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तराखंडमधील सर्व खासदारांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक
– हिमनदी फुटल्यानंतर आलेल्या पुरात रेणी गावात गावांना जोडणारा पूल वाहून गेला. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटलाय. अशाच नऊ गावांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना आयटीबीपीच्या जवानांनी धान्याचे पाकीटं उपलब्ध करून दिली.
– चमोली दुर्घटनेसंबंधी उत्तराखंड पोलिसांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एकूण २०२ जण बेपत्ता झाल्याचं समजतंय. या भागातून आत्तापर्यंत १९ मृतदेह हाती लागलेत
– बोगद्यातही बचावकार्य सुरू आहे. बोगद्याच्या आत १०० मीटरपर्यंत मलबा बाहेर काढण्यात आला आहे. इथेही काही लोक अडकून पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. बोगद्याचा रस्ता जेसीबीद्वारे थोडफार उघडण्यात आल्यानंतर शोधकाऱ्यासाठी टीम्स आणि स्निफर डॉग्सला आत पाठवण्यात येणार आहे.
– अडीच किलोमीटर लांब बोगद्यात बचावकार्य सुरू आहे. मलब्यामुळे अनेक समस्या येत आहेत. मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. आत्तापर्यंत २७ जणांना जिवंत बचावण्यात यश आलंय. एकूण ११ जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. १५३ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तपोवन बोगद्यात ४०-५० जण अजूनही अडकून पडल्याची शक्यता आहे. परंतु, पुरात बरेच लोक वाहून गेल्याची शक्यता आहे : महासंचालक, एनडीआरएफ
– तपोवन बोगद्यात ( Tunnel) रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या बोगद्यात जवळपास ३० जण अडकलेले आहेत. जलप्रलयामुळे हा संपूर्ण बोगदा मलब्यानं भरलेला आहे. जवळपास ३०० जवान या बोगद्यातील मलबा बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर करत आहेत. मलबा आणि मोठाले दगड हटवण्यासाठी जेसीबी मशीनची मदत घेण्यात येतेय. ऑपरेशनसाठी अभियंत्यांचीही मदत घेण्यात येतेय.
– रेस्क्यू ऑपरेशनसाठी भारतीय हवाईदलाकडून ‘एमआय १७’ आणि ‘एएलएच’ हेलिकॉप्टर ‘डिझास्टर रिलीफ टीम’सोबत देहरादूनहून जोशीमठासाठी रवाना झाले आहेत
– तपोवन सुरुंगात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आत्तापर्यंत १६ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. तर १४ मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणांहून हाती लागले आहेत.
– चमलीच्या तपोवन धरणाजवळ सुरुंगात एसडीआरएफकडून बचाव मोहीम राबवण्यात येतेय.
– अंधारामुळे रात्री थोड्यावेळ थांबल्यानंतर सोमवारी पहाटेपासून पुन्हा एकदा आयटीबीपी, भारतीय लष्कर, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या कामाला सुरुवात झालीय.
रविवारी काय घडलं नेमकं?
डेहराडूनपासून २९५ किलोमीटरवर असलेल्या जोशीमठजवळ झालेल्या या हिमस्खलनानंतर गंगा नदीच्या उपनद्या असलेल्या धौलीगंगा, ऋषीगंगा आणि अलकनंदा नद्यांना अचानक पूर आल्यानं उत्तराखंडच्या डोंगराळ भागाला तडाखा बसला आणि भीतीचे वातावरण पसरलं. एनटीपीसीचा तपोवन-विष्णुगड वीजप्रकल्प आणि ऋषीगंगा वीज प्रकल्पांची यात वाताहत झाली आणि इथं काम करत असलेले अनेक मजूर अडकले. तपोवन प्रकल्पाच्या बोगद्यात अडकून पडलेल्या सोळा मजुरांची बचाव पथकांनी सुटका केली. मात्र, १७० जण अद्यापही बेपत्ता आहेत. हिमस्खलनामुळे आलेल्या पुरामुळे नदीकिनारी असलेली घरंही वाहून गेली आहेत. नदीच्या खालच्या बाजूला असलेल्या दाटीवाटीच्या लोकवस्तीच्या गावांनाही महापुराचा तडाखा बसल्याची भीती असून अनेक गावांतील नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. रेनी गावाजवळील पूल वाहून गेल्यामुळे सीमेवरील काही ठाण्यांशी संपर्क पूर्णपणे तुटल्याचं ‘इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस’च्या (आयटीबीपी) प्रवक्त्यांनी सांगितलं. मात्र, संध्याकाळनंतर नदीच्या त्यापुढील प्रवाहाचा भाग सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं.
जलविद्युत प्रकल्प वाहून गेला
उत्तराखंडमध्ये जोशीमठ इथं रविवारी हिमनदी कोसळल्यामुळे तेथील बांधकामांतर्गत असलेला जलविद्युत प्रकल्प वाहून गेला आहे नॅशनल ग्रीडमधील २०० मेगावॉट विजेच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हिमनदी कोसळल्यानं उत्तराखंड इथले तेहरी आणि कोटेश्वर हे दोन विद्युत प्रकल्प खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहेत.
उमा भारतींची प्रतिक्रिया
उत्तराखंडामध्ये झालेल्या नैसर्गिक दुर्घटना ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच मंत्री म्हणून गंगेवर वीजप्रकल्प उभारण्यास माझा विरोध आहे, असे केंद्रीय नदीविकास मंत्री उमा भारती यांनी म्हटलंय.
कुंभमेळ्यासाठी मागणी नाही
दुसरीकडे, हरिद्वार इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी उत्तराखंड सरकारकडे कोणतीही मागणी न करण्याचा निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेनं घेतलाय. रविवारी उत्तराखंडमध्ये हिमखंड तुटल्याने चमोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times