एका वृत्तसंस्थेशी बोलताना निर्भयाच्या वडिलांनी मुख्यमंत्री यांच्यावर फाशीला विलंब होण्याचे खापर फोडले आहे. ‘कोर्टाने हे प्रकरण पुढे ढकलल. ही सुनावणी किती दिवस लांबणीवर राहील हे माहीत नाही. याचा अर्थ केजरीवाल यांनीच हे काम केलं आहे. केजरीवाल यांच्या हातात तुरुंग प्रशासन आहे. तिथूनच सर्व काम थांबलेलं आहे. संपूर्ण सिस्टिम केजरीवाल यांच्या हातात आहे,’ असं निर्भयाच्या वडिलांनी सांगितलं.
निर्भयाची आई आशा देवी यांनी ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना या प्रकरणाचं खापर सरकारवर फोडलं आहे. ‘ही सरकारचीच चालबाजी दिसते. आमचं केवळ सांत्वन केलं गेलं. केवळ मतांसाठीच आम्हाचं सांत्वन केलं गेलं. सात वर्षांपूर्वी हे लोक टोपी घालून झेंडा फडकवत दिल्लीतील महिलांचं संरक्षण करणार असल्याचं सांगत होते. आता तिसऱ्यांदा मतदान होत आहे. मात्र आरोपींच्या वकिलाने मला आव्हान देऊन सांगितलं की, दोषींना फाशी होणार नाही,’ असं आशा देवी म्हणाल्या.
दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. निर्भयाचे दोषी कायदेशीर डावपेच शोधून फाशी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, याचं मला दु:ख आहे. त्यांना विनाविलंब फाशी झाली पाहिजे. बलात्काराच्या प्रकरणात सहा महिन्यांत फाशी व्हायला हवी. त्यासाठी आपल्या कायद्यात तातडीने दुरुस्ती केली गेली पाहिजे, असं केजरीवाल यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावर केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. कृष्ण रेड्डी यांनी केजरीवाल यांच्या या सूचनेचं स्वागत केलं आहे. केजरीवाल यांच्या या सूचनेवर चर्चा झाली पाहिजे. अशा प्रकारच्या गुन्ह्यानंतरही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही कायदेशीर प्रक्रियेच्याद्वारे आरोपी फाशी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, असं रेड्डी यांनी म्हटलं आहे. मात्र, भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. निर्भयाच्या आईच्या डोळ्यांतून निघणारा प्रत्येक अश्रू आणि त्यांची हाय केजरीवालला भस्म करेल, असं मिश्रा यांनी म्हटलं आहे. तर अकाली दलाचे नेते मजिंदर सिंह सिरसा यांनी याप्रकरणी केजरीवाल यांचा धिक्कार केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times